समृद्धीचा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात
समृद्धी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना १०० रुपयांचा तिसरा हप्ता जमा
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
समृद्धी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आज (दि.२२) शुक्रवार रोजी अभिजित सुंदरराव उढाण, मधुकर कुंडलिक जगदाळे,अशोक भाऊसाहेब बोबडे,दिलीप रावसाहेब गुजर, दत्ता तुकाराम वाघमारे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्निक संपन्न झाला.समृद्धी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२०२२ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना समृद्धी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतीश घाटगे म्हणाले की, मागील वर्षी कारखान्याने ५,२२,५०० मेट्रिक टन गाळप करून ५,१४,७०० पोती उत्पादित केली असून, वीजनिर्मितीतून कारखान्यास १७ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे.सरासरी उतारा ९.८५ आला असून कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ आर पी पेक्षा १०० रुपये जास्तीचे अदा केले आहेत. परिसरातील दुसऱ्या कारखान्यांपेक्षा १०० ते १५० रुपये कमी भावाचे कारण म्हणजे उसाची सरासरी रिकव्हरी आहे.तरी यावेळेस रिकव्हरीसाठी कडक नियोजन केले असून साखर उतारा जास्त कसा येईल यासाठी योग्य ते नियोजन केले आहे.जेणेकरून परिसरातील इतर कारखान्यांचा दर समृद्धीच्या शेतकऱ्यांना अदा करता येईल.
यावेळेस समृध्दी साखर कारखान्याच्या सभासदांचा साडे सहा लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून कारखाना ५.५० लाख मेट्रिक टन गाळप करील.एक लाख मेट्रिक टनाच्या उसासंदर्भात इतर कारखान्यांशी गाळपासंबंधी चर्चा चालू आहे.समृध्दी साखर कारखान्याच्या सभासदांनी निश्चिंत असावे.त्यांचा संपूर्ण ऊस गाळप करण्यात येईल. त्यासाठी कारखाना पाऊस पडेपर्यंत चालविण्यात येईल. अतिरिक्त पावसामुळे जायकवाडी धरण १००% भरले आहे.
गोदावरी नदीवरील सर्व बंधारे,छोटी मोठी धरणे १००% भरली असल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढणार असून कारखान्यात ८०० मेट्रिक टन प्रति दिनविस्तारित करण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे.फेब्रुवारी व मार्च महिन्यात काम पूर्ण होऊन पुढील वर्षी कारखाना ३८०० मेट्रिक टन प्रति दिन क्षमतेने चालणार असून त्यामुळे पुढील वर्षी साडे सात लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल.वर्ष २०२०-२०२१ साठी कारखान्याने लागवडीचा प्रोग्राम राबवला होता.त्या प्रोग्राम मधील शेतकऱ्यांनी परिसरातील इतर कारखान्यानंतर परत नोंदी दिल्या असून डबल नोंदी असणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस गाळपाची हमी राहणार नाही असेही ते म्हणाले. तसेच दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र मेठी,सौ.वैशालीताई घाटगे पाटील,सौ.रिंकूताई मेठी व कारखान्याचे संचालक दिलीप मामा फलके,अभिजीतराव उढाण,रंजीतराव उढाण,विकास शिंदे,वर्क्स मॅनेजर माथनकर साहेब, मुख्य शेतकी अधिकारी अमोल तौर,पर्चेस ऑफिसर प्रदिप घाटगे पाटिल,डे.चिप इं. सिंग डे.चिप केमिस्ट माथूरकर सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच भागातील सर्व उस उत्पादक शेतकरी,तोड वाहतुक ठेकेदार मोठया संख्येने उपस्थित होते.