जालना:राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1 हजार 462 प्रकरणे सामोपचाराने निकाली
एकुण 6 कोटी 10 लक्ष 87 हजार 470 रुपये एवढी तडजोडीची रक्कम झाली.
![jalna news](https://newsjalna.com/wp-content/uploads/2021/08/news-jalna.png-02.jpg)
जालना, दि. 4 :- जिल्हा न्यायालय, जालना येथे नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये कौटुंबिक कलहातुन विकोपाला गेलेल्या प्रकरणात तडजोड होऊन दुरावलेले मन आले जवळ, संवाद झाले मनोमिलन या संज्ञेशी साजेल असे सामोपचाराने प्रकरणे मिटविण्यात आली. मोटार वाहन अपघात, कलम 138, नि.ई ॲक्ट, दिवाणी व फौजदारी असे एकुण 438 प्रकरणे, दावा दाखल पूर्व एकुण 276 प्रकरणे, स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण 703 प्रकरणे व ई लोकन्यायालयामध्ये 45 प्रकरणे अशा प्रकारे एकुण 1 हजार 462 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले असुन यामध्ये एकुण 6 कोटी 10 लक्ष 87 हजार 470 रुपये एवढी तडजोडीची रक्कम झाली.
या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्ण कि. केवले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.बी पारवेकर यांच्यासह न्यायिक अधिकारी, सरकारी वकील, विधिज्ञ, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बार कौन्सिलचे सचिव, कर्मचारी तसेच पंच म्हणुन निवृत्त प्राध्यापक बी.वाय. कुलकर्णी यांनी काम पाहिले. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सामोपचाराने वाद मिटवलेल्या पक्षकारांच्या रोपे देऊन प्राधिकरणाच्यावतीने सत्कारही करण्यात आला असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.