मंठा तालुका

मंठा तालुक्यात सोयाबीनला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका

१११ मी. मी पाऊस : कपाशीसह भाजीपाल्याचे नुकसान

images (60)
images (60)

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी, उस्वद व शिरपूर या सज्जातील १० गावांतील सोयाबीन, कापूस व इतर पिकांना १९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत अंदाजे ७० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे तलाठ्यांच्या अंदाजे प्राथमिक अहवालातून समोर आले . तळणीसह शिरपूर व उस्वद सज्जातील देवठाणा, वडगाव सरहद्द, कानडी, आदवाडी, कोकरबा, टाकळखोपा व इंचा गावांतील ५ हजार ३३० हेक्टर वरील सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर ५५३ हेक्टर वरील कापूस व ८१ हेक्टर वरील इतर पिकांसह भाजीपाला व फळबागांना अतिवृष्टीचा फटाका बसला आहे. ही बाब उस्वदचे तलाठी नितीन चिंचोले यांनी २० सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अंदाजे प्राथमिक अहवालातून स्पष्ट केले आहे.

फोटो : मंठा तालुक्यातील जयपूर मंडळात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

दुधा व वझर सरकटे सज्जातील गावांतही पिकांचे मोठे नुकसान …

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत दुधा व वझर सरकटे सज्जातील सासखेडा, लिबखेडा, हनवतखेडा, किर्ला, जाभरुन, तुपा, पोखरी केधळे, भुवन, वाघाळा या गावांतील पिकांचे अंदाजे ७० टक्के नुकसान झाल्याचे दुधा सज्जाचे तलाठी एम पी सांगळे व वझर सरकटे सज्जाचे तलाठी श्रीहरी मुरुकूट यांनी सांगितले.

सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव :

मंठा तालुक्यातील जयपूर मंडळात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडुन शेंगा सुकून गळ होत आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. या संदर्भात जयपूर (ता . मंठा) येथील ज्ञानदेव दत्तात्रय काकडे व शिवाजी गणेशराव काकडे यांनी ( ता. २६ ) रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे …

मंठा तालुक्यातील तळणीसह जयपुर मंडळात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनीही पिकविमा कंपनीना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!