तलाठी एक दिवस हजेरी ,सहा दिवस गायब

जाफराबाद तालुक्यातील
१०१ गावांसाठी असलेल्या ३६ तलाठी सजा कार्यालयात एकही तलाठी कधीच जागेवर मिळत नाही. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना हेलपाटे मारूनही वेळेवर काम होत नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे, आठवड्यातून एखाद्याच दिवशी हे तलाठी महाशय कार्यालयात -येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. मात्र, निर्वावलेली यंत्रणा कुठेच दखल घेत नसल्याने वर्षानुवर्षांपासूनचा चिरमिरीचा हा प्रकार सर्रास सुरूच आहे.
जाफराबाद, माहोरा, वरुड, कुंभारइझरी, टेंभुणों व कोळेगाव या सहा मंडळांतर्गत तलाठ्यांसाठी ३३ सजा कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात एकाही कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नाहीत. यासाठी त्यांनी डमी तलाठी निर्माण केले असून सर्वच कामे या मध्यस्थामार्फत केली जातात. विशेष म्हणजे तलाठ्यांचे सर्व दप्तर शिक्के ‘डमी तलाठ्यां’ कडे असतात. प्रत्येक तलाठी कार्यालयात तलाठी भेटेलच याची कधीच शाश्वती नसते. बहुतांश तलाठी हे मोठ्या शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असतात.
फोनवरूनही शेतकरी अथवा सर्वसामान्यांशी त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. यामुळे दलालामार्फतच तलाठ्यांची कामे करून घ्यावी लागतात. कोणत्याही तलाठी कार्यालयात तलाठ्यांचे हालचाल रजिस्टर नाही. यामुळे कार्यालयातील डमी तलाठ्यांना विचारणा केली असता ‘साहेब दौऱ्यावर आहेत’ असे नेहमीचे उत्तर मिळते. कधी सुटीवर, कधी दौऱ्यावर तर कधी शासकीय कामासाठी जिल्ह्याला असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. विशेष म्हणजे पैसे देवूनही अनेकांचे कामे वेळेवर होत नाही याबाबत वरिष्ठ अधिकारी ब्र शब्द काढत नसल्याचे महसूल विभागाची अवस्था ‘तेरी भी चूप मेरी भी चूप अशी झाली आहे