घनसावंगीतील बँकेत गर्दीचा फायदा घेऊन दहा हजार लंपास, तीन संशयीत ताब्यात
घनसावंगी / प्रतिनिधी
घनसावंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या बँकेत गर्दीचा फायदा घेऊन शेतकऱ्याच्या खिशातून 10 हजार रुपये चोरणाऱ्या तीन संशयित आरोपिंना अवघ्या तीन तासांत पकडण्यात घनसावंगी पोलिसांना यश आले आहे . त्यामुळे घनसावंगी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे . यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 15 सप्टेंबर 2021 रोजी घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील शेतकरी विक्रम एकनाथ खाडे ( वय 50 वर्ष ) यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली की ते 15 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजेच्या सुमारास ते त्यांची दोन मुले रामेश्वर खाडे व सोपान खाडे सोबत बँक ऑफ महाराष्ट्र घनसावंगी येथे त्यांच्या नावावर आलेले ठिबक सिंचनचे पैसे काढण्यासाठी आले होते . विक्रम खाडे यांनी त्यांच्या नावे असलेले 20 हजार रुपये बँकेचा विड्रॉल भरुन काढले . काढलेले पैशामध्ये सर्व 100 रुपयांच्या नोटा होत्या .
दहा दहा हजारांचे दोन बंडल त्यांनी त्यांच्या उजव्या खिशामध्ये ठेवले व थोड्या वेळाने त्यांनी खिशात हात घातला तेव्हा त्यांना त्यांच्या खिशात फक्त एकच दहा हजार रुपयांचे बंडल दिसले . तेव्हा त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता पैसे सापडले नाही . म्हणुन त्यांची खात्री झाली की कोणीतरी त्यांचे पैसे खिशातुन काढुन घेतले आहे . तेव्हा त्यांनी बँक मॅनेजर यांना झालेली हकीगत सांगीतली व बँकेच्या बाहेर आले . त्यांनी काढलेली रक्कम पैकी 10 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातून चोरुन नेली आहे . सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासात सदर गुन्ह्यातील 3 संशयित आरोपींना पकडण्यात घनसावंगी पोलिसांना यश आले आहे .
या संशयित आरोपीचे नाव अविनाश रमेश चव्हाण ( वय 19 वर्ष ) रा . घनसावंगी जि.जालना 2 ) सुंदर उर्फ सुदाम बालु काळे ( वय 25 वर्ष ) रा.हातडी ता . घनसावंगी जि.जालना 3 ) राम घन्शीराम चव्हाण ( वय 20 वर्ष ) रा.जांबसमर्थ ता.घनसावंगी जि.जालना असल्याचे पोलिसांनी सांगितले . आणखी त्यांच्या साथीदारांचा शोध घेणे चालू आहे . सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे , पोलिस उपनिरीक्षक डोलारे , ठाणे अमलदार बाळासाहेब मंडलिक , विठ्ठल वैराळ , गंगाराम कदम यांनी केला .